Wednesday, March 30, 2011

अरे हे थांबवा रे

अरे हे थांबवा रे.......

दिसली कविता की,

उगीच अभिप्राय ठोकुन दे.

छान,सुंदर,ग्रेट,झक्कास..

असे उगीच काहीही फेकुन दे.

.

प्रोत्साहन देणे म्हणजे

झाडावर चढवणे नसते.

आपल्यातला दिसला की,

राखीव ढोल बडवणे नसते.

.

हीला कविता कसे म्हणावे ?

हा साधा प्रश्नही पडत नाही .

खोट्या कौतुकाच्या पुढे

इथे काही काही घडत नाही .

.

शब्दापुढे शब्द मांडले की,

त्याची कविता होत नाही.

आतले बाहेर ओतल्याशिवाय

तिला कवितापण येत नाही.

.

मला दिसतेय कविता

गटा-गटात अडकते आहे.

बिचारी दर्जेदार कविताही

एखादा वाचक हुडकते आहे.

.

जग बदलतेय हे खरे तर

कवितेला बदल का रूचत नाही?

चाकोरीबद्ध विषयांशिवाय

दुसरी कविताच का सूचत नाही?

.

कोणी रोखीत नाही म्हणून

लिहायचे म्हणून लिहू नका.

आपल्याबरोबर शब्दांचा अ‍न्

वाचकांचाही अंत पाहू नका.

.

लिहिणाराने लिहित जावे

त्याच्या काळज्या कुणा आहेत?

या रविकिरण मंडळाच्याच

पुन्हा नव्या पाउलखुणा आहेत.

.

मलाच हे समजावे,

एवढा मी काही शहाणा नाही.

दिसले तेच सांगतोय

यात कसलाही बहाणा नाही.

.

पटले तर होय म्हणा,

नाही तर आहे तसे चालू द्या.

शेवटी कविताच सांगते

मुक्यालाही शब्दाने बोलू द्या.

.

वाटले तर कवितांचे

आपण पाळणेही लांबवू शकतो !

आपल्यासाठी नाही पण

कवितेसाठी तरी हे थांबवू शकतो !!

.

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

Post a Comment