कळ्या फुले
गंधावर असतो फुलांच्या
सतत भृंगांचा पहारा
नसतो नाजूक पाकळ्यांना
भगवंताचाही सहारा
असतात फुलपाखरेही
रस वेचण्या टपलेली
मकरंदाची कुपी
पाकळीत नाजूक जपलेली
फुले असतातच केवळ
भरवण्यासाठी बाजार
सुकेपर्यंत फक्त
त्यांचा असतो शेजार
उमलत्या कळीला सतत
वाटत असते भय
कधीही करावा लागेल
देहाचा तीच्या विक्रय
कळीचा जन्मच जणू
असतो खुडण्यासाठी
शोभा असेपर्यंतच
आनंदात उडण्यासाठी
पण नसते कधीच ती
मुक्त मुग्ध स्वच्छंद
कारण असतो सा-यांनाच
कळ्या फुलांचा छंद
कधी खुलवते कुणाचा
विजोड केशसंभार
कधी चुरगळतात तीला
कुणाकुणाचे शृंगार
कधी होते पवित्र
ईश्वराच्या चरणात
निर्माल्य मिसळते मात्र
धूळमातीच्या कणात
खरंच, त्या कळीला
मनतरी असेल काय?
असेल कोंडत सारेच भाव
तीच्या मनाची साय
असेल मनास तीच्या
मायाममतेच्या तृष्णा
बाजारू सा-या जगाची
धुमसत असेल घृणा
तमा कुणास त्याची
सारेच जग स्वार्थी
तीचा जन्मच जणू
उपभोगाच्या अर्थी
जन्म कसा हा दिला
जाब पुसे ती अक्रोशात
'सु'मनाचे सुख क्वचित
दु:ख मात्र शाश्वत
==========
सारंग भणगे. (डिसेंबर १९९७)
No comments:
Post a Comment