ती कितिकदा रडली होती माझ्याकड़े येउन
कितीतरी वेळ बसायची शुन्यात नजर लावून
म्हणायची खूप कंटाळले आहे आयुष्याला
किती काळ कोंडून ठेऊ आतल्या आत जिवाला
मी फार तर तिला कपभर दूध देऊन शांत केलं
चार प्रेमभरे शब्द बोलून तीच मन हलकं केलं
म्हणाली ताई उद्या धरनं कामाला न्हाय जमायचं
आमचा सांड लायी ध्वूतो आता म्हाज्यान न्हायी व्हायचं
मला तिचं नवा-या विषयीचं बोलणं ऐकून कसंतरीच झालं
सॉफेस्टीकेटेड मनाला हे असं बोलणं नव्हतं पटलं
काही दिवस ती आलीच नाही मला तिचे वेध लागले
काय झालं असेल तिचं मनात अनेक प्रश्न येऊ लागले
बातमी आली , ती मेली , धक्का बसला, कशी गेली?
आत्महत्या केली की नवा-याने मारली ???
तिचे शब्द आठवले , तिने तेच केल असणार
मी विचारलं की तीच प्रेत कुठे नेणार
मी धावले , तिच्या कड़े , सांगा तिला कुठे नेलं?
बेवारशी स्मशान भूमि .... उत्तर आलं .....
-स्वरदा...
No comments:
Post a Comment