Wednesday, March 30, 2011

त्यांच्या डोळ्यात पाणी

ती आपल्या मुलीला देणार चोरून गोड़ दही

मला मात्र ताटात वाढणार शिळ-पाकं काही-बाही



भरजरी साडी आणेल आपल्या मुलीला ...आणि

मला म्हणेल ए बाई तुझ्याकडे फार साड्या झाल्या



मुलीचा वाढदिवस जोरदार साजरा केला आणि

मला म्हणाल्या अग्गोबाई तुझा b'day विसरून गेला



एक दिवस आजारी पडले अगदी कोमेजून गेले

त्यांच्या डोळ्यात पाणी, थांब हं औषध घेउन आले

- स्वरदा...

ती

ती - बाई होती

मी - आई होते

ती - दाई होती

मी - माई होते



ती - कष्ट करणार

मी - निवांत बसणार

ती - जाऊ का विचारणार

मी - काम सांगणार



ती - पगार मागणार

मी - चुका सांगणार

ती - काकूळती होणार

मी - फ़क्त ऑर्डर करणार



ती - मुलांना जीव लावणार

मी - मुलांना ओरडणार

ती - जाउदेत ताई

मी - त्यांची आहे आई



ती - सहन करते

मी - डाफरते

ती - दाई आहे

मी - आई आहे

- स्वरदा

ती दारात उभी होती

ती दारात उभी होती

दाट केस, रंगीत साडी

भडक मेक-अप

वेगळाच अंदाज दुनियेकडे बघण्याचा

कसला हिशोब होता हे असं वागण्याचा???



नजर भेदक

निरळीच अदाकारी

आकर्शक हालचाल

काय करत होती ती?कशासाठी?

अन्न मागणा-या निर्दय पोटासाठी ...

अन्न मागणा-या निर्दय पोटासाठी ...

-स्वरदा...

दोष

दोष

तुझा दोष नाही तू माझा बाळ

नसे सकल जना

जाणीव ही



तुझी हेटाळणी, माझे पाप कर्म

जाणून होती जखमा

माझ्या चित्ती ..ll



दिस माझा वैरी अन् रात्र ही वै-याची

माझ्याच देहाची

मी कैदी ..ll



काय करावे, सांग माझ्या बाला

आई होण्या मला

लाज वाटे ..ll



बाला तुझा दोष नाही, मीच पापी आहे

माझ्याच भोगांचे कोड़े

मलाच सुटेना ..ll

- स्वरदा...

फ़कीर

फ़कीर

त्याचं क्षितिज त्याने आखून ठेवलं आहे

त्याला कसला भास् आणि त्रास का असावा

त्याने त्याच्या शांत मुद्रे खाली

सगलेच आभास पुरून टाकले आहेत कायमचे

विश्वाच्या उद्धाराच्या चिंतेने

तो स्वतःच इतका ग्रासून गेला की

सूर्य आणि चंद्राला ग्रहण देखिल

सोपे वाटू लागले



त्यानं स्वतःच आभाळ गोंदून घेतलं

स्वतःच्याच कापाळी आणि

तो निघालाय स्वतःच सूर्य बनून मावलायला

सारं आकाश त्याने भगव्या रंगाने रंगवून टाकलं

आणि त्या जगतनियंत्यालाच विरक्तिचा भास झाला



तो मानवतेचा जागर आहे

तो एक फ़कीर आहे

सारं जग हरवलं आहे आणि तो

हातामध्ये ह्रदय घेउन फिरतोय आणि म्हणतोय

..घ्या हो उधार घ्या ही माणुसकी आहें ...

..घ्या हो उधार घ्या ही माणुसकी आहें ...

- स्वरदा...

आतुर जीव

आतुर जीव

धरेला आस ,

तहान जिवास ,

तुझ्या प्रेमास ,

आतुर जीव... ll





पोटाला चिमटा ,

पायाला काटा ,

भुकेला वाटा ,

कशा देऊ?... ll



धरनिचा बाळ ,

ओढवेल काळ ,

डोळ्यांत जाळ ,

पेटलासे... ll



तुह्या आशेवर ,

कर्जाचा भार ,

जिवितांचे सार ,

शेतकरी... ll



आता जगावे कसे ,

लागेल पिसे ,

पलटती फासे ,

जिवावरी ....ll



कोठे लपवू जीव ,

कोणा येइल किव ,

मह्या पिलांची चिव चिव ,

जीव घेई... ll



आता धरवेना तग ,

धरणी माते जाग ,

बाळ मरतो ग हाक ,

पोटाशी घे,....ll

- स्वरदा...

ती कितिकदा रडली होती माझ्याकड़े येउन

ती कितिकदा रडली होती माझ्याकड़े येउन

कितीतरी वेळ बसायची शुन्यात नजर लावून



म्हणायची खूप कंटाळले आहे आयुष्याला

किती काळ कोंडून ठेऊ आतल्या आत जिवाला



मी फार तर तिला कपभर दूध देऊन शांत केलं

चार प्रेमभरे शब्द बोलून तीच मन हलकं केलं



म्हणाली ताई उद्या धरनं कामाला न्हाय जमायचं

आमचा सांड लायी ध्वूतो आता म्हाज्यान न्हायी व्हायचं



मला तिचं नवा-या विषयीचं बोलणं ऐकून कसंतरीच झालं

सॉफेस्टीकेटेड मनाला हे असं बोलणं नव्हतं पटलं



काही दिवस ती आलीच नाही मला तिचे वेध लागले

काय झालं असेल तिचं मनात अनेक प्रश्न येऊ लागले



बातमी आली , ती मेली , धक्का बसला, कशी गेली?

आत्महत्या केली की नवा-याने मारली ???



तिचे शब्द आठवले , तिने तेच केल असणार

मी विचारलं की तीच प्रेत कुठे नेणार



मी धावले , तिच्या कड़े , सांगा तिला कुठे नेलं?

बेवारशी स्मशान भूमि .... उत्तर आलं .....

-स्वरदा...

एक जीवन जन्मास आल काल

एक जीवन जन्मास आल काल

स्वछ,निरोगी,थंड खोलीत



विकत घेतलेला मोकळा स्वाश घेत

एका मोठ्या रकमेच्या जोरावर ....

अभिमानाने रडत....

एका श्रीमंत देहावर खेळत



एक असच जीवन त्याच वेळेस

जन्मास आल......

तुटलेल्या पायावर उभ्या असलेल्या झोपडीत

फुकटचा,दुषित स्वाश घेत

तोकड्या रकमेत ......



जन्म दोघांचाही एकाच विश्वात

पण घेतल्या जाणार्या श्वासांचे नाव मात्र

गरीब आणि श्रीमंत ,,,,

एक सुरवात जगणारी ......

आणि दुसरा सुरवातीलाच अंत ...



एकाची नाजूक पावले वरचढ

दुसऱ्याची पाऊल ठेवण्यास धडपड



एकाच नसीब पूर्वीच लिहिलेलं

एकाच लिहिण्या पूर्वीच खोडलेल



जगतील ते त्यांच्या स्वतंत्र विश्वात

किवा जगवले जातील .....

शेवटास त्याच्या नेहमीसारखेच उचलले जातील

पण तिथे हि काही खांदे ...

गरीब आणि कुठे श्रीमंत असतील......



......................(निलेश)

जगावे असे कितीसे

जगावे असे कितीसे

...जीवन ते ठरलेले

जागावे असे कितीसे

...स्वप्न डोळ्यात उरलेले



चालावे असे कितीसे

....पाय ते खेचलेले

रस्ता फुलोरी जरी हा

.......काटे बोचलेले



बोलावे असे कितीसे

..शब्द सारे चोरलेले

कधी गोड वाटे ऐकण्या

...कधी ते टोचलेले



जीवनपट हा कितीसा

...खेळ तीन अंकात वाटलेले

कधी परद्या आड सुरु

...कधी परदे ओढलेले



..................(निलेश)

जगून घ्या जगून घ्या

जगून घ्या जगून घ्या 

तो म्हणत होता

हे म्हणताना न जाणे

तो किती मरत होता



गडगडाटी हास्य त्याचे

भितीदायक वाटणारे

ऐकणा-याचा थरकाप

पण मजेशीर वाटणारे



म्हणतात लोक वेडा आहे

कोण जाणे कुठून आला

जातायेता दिसत असतो

अजुनही तो हसत असतो

-स्वरदा...

काजळडोह..

काजळडोह..

काजळडोहातील बाष्प

पिसासारखं तरंगतं

आणि आकार घेतो

हिमधवल अरबी अश्व..

चौखूर उधळण्यासाठी



तेव्हां



डोहावर एक मेघ

सोनसळी किरणांना

रोखून धरतो..

उधळलेला अश्वमेध

अडवण्यासाठी




-संध्या

तुझे येणे..( आठवण )

तुझे येणे..( आठवण )

तुझे असे

झणी येणे

तुझे असे

झणी जाणे



खेळ तुझा

गुण गुणा

वेड लावी

माझ्या मना..



थांब जरा

दोन क्षण

खोल ना रे

तुझे मन



वाट पाहे

कधीची गं

पुन्हा तुझ्या

येण्याची गं



तुझे येणे

हवे मना

तुझे जाणे

साहवेना..


-संध्या

पडून कोपा-यात एका

पडून कोपा-यात एका

पद्पथाच्या बाजूला

अंगाचे वेटोले

आले होते झोपेला



डोळ्यामध्ये पाणी

मनामध्ये आशा

भूका या पोटाच्या

भागायच्या कशा?



दूर कुठे घर

जावे कसे कुठे

डोळी स्वप्न होते

व्हायचे मोठे



दशा कपड्यांचा

चिंधीच म्हणावी

व्यथा असल्यांची

कोणी जाणावी

-स्वरदा...

जीवना तू चाल पुढे

जीवना तू चाल पुढे

किती भिन्न जीव इथे तरी

सोबतीस वाटचाल आहे

कडवे तुटके गीत जीवना

जुडवलेले ताल आहे



जीवन सागरात या

तंरगने पोहणे बेताल आहे

ढकलती काही,काही दुबवती

वाचणाऱ्या चेही हाल आहे



कुणी फाटके जीवन घेवून

कुणी जीवनात मालामाल आहे

चोरनारयांचे जीवन झाले

मागणारे इथे कंगाल आहे



...............(निलेश)

जीवितांच्या कवितांसाठी

जीवितांच्या कवितांसाठी,शब्दांचा श्वास

शब्दांच्या श्वासात,कवितेचा प्राण

कवितेच्या प्राणात सुरांचा ओंकार

ओंकारध्वनित जीविताचा आभास!!

या आभासातच जीवन रंग असतात

शब्दांना सुरांना नवे रूप देतात

माणसाला दिसतात वाळूतल्या

अस्पष्ट -धूसर शब्द्खुणा

त्यांनाच तो जीवन म्हणतो पुन्हा-पुन्हा

त्या खुणांच्या आभासात जीवन शोधायचे असते

भावनांच्या राखेतून पुनश्च उभे राहायचे

फिनिक्स पक्ष्याप्रमाणे





साधना-------१६--३--११

आठवणी च्या प्रेता ....

आठवणी च्या प्रेता ....

उठ जागा हो

डोळे उघडून बघ

तू सारे सारे सोडून गेलास

ते सारे आताही तिथेच आहे

जागच्या जागी जसेच्या तसे आहे



वाळलेलं झाडही पानं गालून टाकतं

तुझ्याही कुबट विचारांची चिपाडं

झाडून टाक आता

तुझं सुंदर रूप जगाला कलू दे

तुझ्यावर जळणा-यांना परत थोडं जलू दे



तू समुद्र होतास

आता डबकं झाला आहेस

नवीन खडा पडला आहे

जे तरंग उठतील त्यांच्या लाटा होउदेत

पावसाचा पैसाही पुन्हा खोटा होउदेत



तू पुन्हा एकदा बहर

गंधाळलेलं तुझं अस्तित्व हवं आहे

आता मरून पडू नकोस

तू सार्या जिवितांची आशा आहेस

तू बोलक्या कवितांची भाषा आहेस

- स्वरदा...

तिरंग्याचे मनोगत

तिरंग्याचे मनोगत 

हल्ली झेंडे एवढे झालेत की,

मलाही फडकावे वाटत नाही.

तुम्ही एवढे मोकाट झालात की,

मलाही अडकावे वाटत नाही.



" झंडा ऊंचा रहे हमारा "

हे फक्त गाण्यातच राहू लागले !

दुश्मनांची गरजच काय?

आपलेच पाण्यात पाहू लागले.



त्या नि:स्वार्थी क्रांतीवीरांची

ती सलामीच खरी होती !

आजचा स्वैराचार पाहून वाटते,

ती गुलामीच बरी होती !!



-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

मैत्री : एक शोध

मैत्री : एक शोध



जेंव्हा जीवाचं शिवाला,

रंकाचं रावाला,

भक्ताचं देवाला,

न सांगताही कळलं जातं.

तेंव्हाच आपोआप...

मैत्रीचं नातं जुळलं जातं.



मैत्री मैत्री असते,

मैत्री जन्मदात्री असते,

मैत्री म्हणजे खात्री असते,

मैत्री म्हणजे पत्रापत्री असते,

मैत्री म्हणजे,

कधी तीची,कधी त्याची,

भर पावसात,

उन्हाळ्याच्या दिवसात,

दोघांत....

फक्त एकच छत्री असते.



मैत्री म्हणजे लुकलुकणारं चांदणं,

मैत्री म्हणजे हातावरचं गोंदणं,

मैत्री म्हणजे मना-मनातल्या

तणाचं वेळोवेळी निंदणं !

मैत्री म्हणजे,

एकमेकांच्या कुशीत स्फुंदनं !!



मैत्री रडवते,

मैत्री हसवते,

मैत्री सांगुन फसवते,

मैत्री मना-मनात नवा स्वर्ग वसवते !!



मैत्री विहिरीतला पारवा,

मैत्री रानातला सरवा,

मैत्री उन्हातला गारवा,

मैत्री मिसळीतला झणझणीत शरवा !!



राधेचा संग असते मैत्री,

मीरेचा रंग असते मैत्री,

द्रौपदीचे न उलगडलेले

गुढ अंग असते मैत्री.

सुदाम्याच्या किड्क्या पोह्या्त

कधी गुंग असते मैत्री.

कधी कर्ण दुर्योधनाच्या

प्रेमात दंग असते मैत्री.



मैत्री क्षणभर टेकायला हक्काचं स्थळ देते,

मैत्री लागेल एवढी कळ देते,

मैत्री जगायला आभाळाएवढं बळ देते !!



-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

अरे कसाबा

अरे कसाबा.....

कबुलीजबाब दिलास तरी

तुझा गुन्हा माफ होणार नाही.

तुला शिक्षा दिल्याने काही

कुणाचा जीव परत येणार नाही.



तरीही नराधमा,

तुला फाशीच देणे भाग आहे.

तुझ्याएवढाच तुझ्या पोशिंद्यावर

आमच्या सर्वांवा राग आहे.



भित्र्या,एकदा दिलास तर

कबुलीजबाब पलटु नकोस !

सापाची औलाद असलास तरी

खाल्ल्या मिठावर उलटु नकोस !!



-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

निळू फुले:एक श्रद्धांजली

निळू फुले:एक श्रद्धांजली 

निळूभाऊ,

तुम्ही नायक असूनही

खलनायकाचाच.....

अभिनय करीत राहिलात...

तोही एवढा जिवंत की,

गावाकड्च्या आया-बाया ..तुमच्या नावनं बोटं मोडायच्या...

सैतान..राकीस म्हणायच्या तुम्हाला !

निंळूभाऊ एवढा रांगडा आणि अस्स्ल सलाम

कुणालाच घेता आला नाही..घेताही येणार नाही!

तुम्ही खलनायकांवर प्रेम करायला शिकविलेत..

नाही प्रेम करायला भाग पाडलेत !!

”मास्तर..वाड्यावर या..."

"गं...sssssssssssssss साजणी......"

असे सूर भिनलेत रोमारोमांत !

तुमचा कुणाशी सामना नव्हता...

कसल्या पिंजर्‍यात अडकला नाहीत....

तुम्ही रसिकांच्या सिंहासनावर म्हणूच..चिरतंन स्वार आहात...स्वार रहाल..अगदी चिरंतन !!



-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

हासेगावचा रडकेपणा

हासेगावचा रडकेपणा



गाव करील ते

राव करू शकत नाही.

पण सरकार तर करू शकते.

मतदान घेऊन प्रश्न सोडविणे

एड्सपेक्षाही घातक ठरू शकते.



उद्या गावागावातही

असाच बहिष्कार टाकला जाईल !

म्हातारी तर मरेलच

पण काळही सोकला जाईल !!



-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

अरे हे थांबवा रे

अरे हे थांबवा रे.......

दिसली कविता की,

उगीच अभिप्राय ठोकुन दे.

छान,सुंदर,ग्रेट,झक्कास..

असे उगीच काहीही फेकुन दे.

.

प्रोत्साहन देणे म्हणजे

झाडावर चढवणे नसते.

आपल्यातला दिसला की,

राखीव ढोल बडवणे नसते.

.

हीला कविता कसे म्हणावे ?

हा साधा प्रश्नही पडत नाही .

खोट्या कौतुकाच्या पुढे

इथे काही काही घडत नाही .

.

शब्दापुढे शब्द मांडले की,

त्याची कविता होत नाही.

आतले बाहेर ओतल्याशिवाय

तिला कवितापण येत नाही.

.

मला दिसतेय कविता

गटा-गटात अडकते आहे.

बिचारी दर्जेदार कविताही

एखादा वाचक हुडकते आहे.

.

जग बदलतेय हे खरे तर

कवितेला बदल का रूचत नाही?

चाकोरीबद्ध विषयांशिवाय

दुसरी कविताच का सूचत नाही?

.

कोणी रोखीत नाही म्हणून

लिहायचे म्हणून लिहू नका.

आपल्याबरोबर शब्दांचा अ‍न्

वाचकांचाही अंत पाहू नका.

.

लिहिणाराने लिहित जावे

त्याच्या काळज्या कुणा आहेत?

या रविकिरण मंडळाच्याच

पुन्हा नव्या पाउलखुणा आहेत.

.

मलाच हे समजावे,

एवढा मी काही शहाणा नाही.

दिसले तेच सांगतोय

यात कसलाही बहाणा नाही.

.

पटले तर होय म्हणा,

नाही तर आहे तसे चालू द्या.

शेवटी कविताच सांगते

मुक्यालाही शब्दाने बोलू द्या.

.

वाटले तर कवितांचे

आपण पाळणेही लांबवू शकतो !

आपल्यासाठी नाही पण

कवितेसाठी तरी हे थांबवू शकतो !!

.

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

एटी-केटी

एटी-केटी

दहावी-बारावीच्या मुलांच्या कपाळी

आता नापासाचा शिक्का बसणार नाही.

आषाढीबरोबर कार्तिकीच्या

वारीचाही कपाळी बुक्का बसणार नाही.



मुलांची वर्षॆ वाया जाऊ नयेत

म्हणून ही कल्पना तर भारी आहे !

नाहीतरी पहिली ते दहावीला

सध्याही 'एटी-केटी' च तर जारी आहे !!



-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

अशी ही नावानावी

अशी ही नावानावी

थोर- थोर महापुरूषांना

आपण रस्त्यावर आणतो आहोत

ह्यांचे नको,त्यांचे हवे

परस्परांनाच ताणतो आहोत.



थोर-थोर महापुरूष असे

फक्त नावापुरते उरले आहेत !

जाती-जातीची बीजंही

महापुरूषांच्या मागे पेरले आहेत !!



-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

घरगुती बजेट

घरगुती बजेट

म्हणायला द्वितंत्री कारभार,

तसा तो एकतंत्री असतो.

घरोघरी गृहमंत्री हाच

पदसिद्ध अर्थमंत्री असतो.



गृहमंत्र्याच्या हातातच

अर्थमंत्र्याच्या नाड्या असतात.

ज्यांना हे जमत नाही

त्या बिचार्‍या वेड्या असतात.



घरगुती बजेटचा अंदाज तरी

सांगा कुठे रास्त असतो ?

आपत्कालीन खर्चच

बजेटपेक्षा जास्त असतो !!



-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

दळभद्री विचार

दळभद्री विचार

मुंबईतला सागरी पूल तर

दोन्ही कॉंग्रेसला जोडू लागला.

रस्त्यावरच्या भिकार्‍यांना मात्र

नवाच प्रश्न पडू लागला.



नामकरणाच्या राजकारणाशिवाय

राजकारण्यांना जगता येणार नाही !

भिकार्‍यांचे दु:ख हे की,

त्या पुलाखाली बसून

भिक मागता येणार नाही !!



-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

उपास-तपास

उपास-तपास

उपवासाच्या दिवशीच

नवनवे मेनू स्फूरू लागतात.

साबुदाण्याने उसळी मारताच

बिच्चारे चिप्स कुरकुरू लागतात.



वड्याचे तेल असे

वांग्यावरती काढले जाते !

नायलॉनच्या जाळीने

पुण्य पदरी पाडले जाते !!



-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

समलैंगिकतेची मान्यता

समलैंगिकतेची मान्यता

आपण पुढा्रलेलो आहोत

याची प्रचिती यायला लागली.

पोटाच्या प्रश्ना ऎवजी

चोटाची चर्चा व्हायला लागली.



आता लैंगिकच नाही तर

समलैंगिक शिक्षण द्यावे लागेल ?

कितीही हादरलो,भेदरलो तरी

हे नव्याने समजून घ्यावे लागेल !



-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

ममताशून्य रेल्वे अर्थसंकल्प

ममताशून्य रेल्वे अर्थसंकल्प
लालू तर चालूच होता
बॅनर्जींनाही ममता नाही.
जरा रेल्वे अर्थसंकल्प बघा
तुम्हांलाही दिसेल समता नाही.
आपलाच दाम खोटा,
म्हणूनच असे फसवित आहेत !
मुंबईत परप्रांतीयांचे लोंढे
डब्या-डब्याने घुसवित आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)